Thursday 30 October 2014

अंधार क्षण - वुल्फगांग हाॅर्न

२२ जून १९४१. पहाटे ४.३० वाजता जर्मन तोफखान्याचा पहिला गोळा सोविएत हद्दीत आदळला आणि जगातल्या सर्वात मोठ्या आणि सर्वात संहारक आक्रमणाला प्रारंभ झाला. या तोफखाना दलाचं नाव होतं पँझर. तोपर्यंत जर्मनीने दुस-या महायुद्धात मिळवलेले सगळे नेत्रदीपक विजय हे पँझरचंच कर्तृत्व होतं.
एकामागोमाग एक तोफगोळे सोविएत सैनिकांवर आणि तटबंदीवर आदळत होते. ते दृश्य बघून २२ वर्षांचा वुल्फगांग हाॅर्न प्रचंड भारावून गेला होता. " आमच्या सैन्याची ताकद बघून जी भावना मनात आली तिचं शब्दांत वर्णन करता येणार नाही. मला अजून एका गोष्टीमुळे खूप आनंद झाला होता - आम्ही आमची ताकद आमच्या प्रच्छन्न शत्रूविरुद्ध वापरत होतो - अत्यंत धोकादायक आणि हलकट असा शत्रू."

यापुढचे ५ महिने वुल्फगांगने अशाच भारावलेल्या मन:स्थितीत काढले. जेव्हा मी त्याची मुलाखत घेतली तेव्हा मला हे जाणवलं की युद्धाची काळी बाजू त्याने पाहिलीच नसावी. त्याच्यासाठी युद्ध म्हणजे एखाद्या वाघसिंहांसारख्या मोठ्या प्राण्याची शिकार करण्यासारखंच होतं.

वुल्फगांग आणि त्याच्यासारख्या अनेक जर्मन सैनिकांनी मला सुरूवातीलाच हे सांगितलं होतं की ते कट्टर नाझी अजिबात नव्हते. १९३० च्या दशकात वुल्फगांग हिटलर युवा (जर्मन भाषेत Hitler Jugend किंवा HJ) या संघटनेचा सदस्य होता पण त्याला नाझीवादाचं काही खास आकर्षण नव्हतं , " मला असं वाटलं की जर मी हिटलर युवाचा सदस्य बनलो तर पुढे भविष्यात अनेक दरवाजे आपोआप उघडतील. मी आठवड्यातून एकदा त्यांच्या संध्याकाळच्या वर्गांना जायचो आणि दर रविवारी युद्धाचं प्रशिक्षणही घ्यायचो. त्यात व्यायाम आणि शिस्त या गोष्टी महत्त्वाच्या होत्या. माझ्या घरीही त्यामुळे कोणी विरोध केला नाही. "
वायमार इथे झालेल्या एका समारंभात त्याला खुद्द अॅडाॅल्फ हिटलरला भेटायची संधी मिळाली पण हिटलरच्या व्यक्तिमत्त्वाने तो अजिबात प्रभावित झाला नाही, " तिथल्या स्थानिक नाझी पक्षाच्या नेत्यांबरोबर हिटलरने रस्त्यावर संचलनात भाग घेतला. त्याच्याबरोबर इतर उच्चपदस्थ नाझीही होते.
पण हिटलर एकदम निस्तेज, अतिसामान्य दिसत होता. मी तर त्याला पाहून निराश झालो. त्याच्या भाषणातही काही नवीन मुद्दे नव्हते. तेच तेच विचार तो परत परत मांडत होता. आम्हाला हे सगळं आधीच माहीत होतं."
पण विशेष बाब ही आहे की जरी वुल्फगांगला  हिटलर आणि नाझीवाद यांच्यात रस नव्हता तरी त्याचा जर्मनीने सोविएत रशियावर केलेल्या आक्रमणाला पाठिंबा होता. त्याच्यासाठी हिटलरपुढे स्वतःला पूर्णपणे समर्पित न करणं आणि तरीही त्याच वेळी कम्युनिस्टांना पूर्णपणे संपवलं पाहिजे असं मानणं हे शक्य होतं. १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात जेव्हा मी त्याची मुलाखत घेतली तेव्हा तो म्हणाला की जर नाझी सोविएत रशियाविरूद्ध जिंकले असते तर पूर्व युरोपचं रशियाप्रणित साम्यवादापासून संरक्षण झालं असतं.
म्हणजे वुल्फगांगच्या मते नाझी जर्मनीने जंगली आणि असंस्कृत रशियनांपासून युरोपचं संरक्षण करण्यासाठी रशियावर आक्रमण केलं. त्यामुळे जेव्हा तो सैन्यात दाखल झाला तेव्हा त्यामागे एक नैतिक अधिष्ठान होतं. दुसरं कारण म्हणजे त्याला असं मनापासून वाटत होतं की रशियन लोक जर्मनांच्या तुलनेत हीन वंशाचे आहेत, " त्यांचं राहणीमान पाहूनच कोणालाही कळलं असतं. इतकी गलिच्छ घरं आणि इतकी गरिबी! आम्ही आमचा दारूगोळा अशा लोकांवर अजिबात वाया घालवला नाही. पूर्ण युरोप जर राहणीमानानुसार अ,ब आणि क या तीन भागात विभागला तर रशिया म्हणजे क विभाग. सर्वात गरीब आणि गलिच्छ." हे सगळं बोलत असताना त्याच्या चेह-यावर स्मित होतं. त्याचा असा ठाम विश्वास होता की जरी रशियन सैन्याने जर्मनांना पराभूत केलं असलं तरी त्यांचा दर्जा जर्मनांपेक्षा हलकाच होता.

रुसो-जर्मन युद्धाच्या नंतरच्या काळात त्याने सोविएत प्रतिकारकांविरुद्धच्या दग्धभू लढायांमध्ये भाग घेतला. सोविएत प्रतिकारक जर्मन सैन्याच्या मुख्य आक्रमणरेषेच्या मागे राहून जर्मन सैन्यावर हल्ला करत. दिवसा ते गावांमध्ये राहात, सर्वसामान्य शेतक-यांसारखे वावरत पण रात्री जर्मन सैन्याच्या मोर्च्यांवर गनिमी हल्ले चढवत. त्यामुळे त्यांना आश्रय देणारी गावं नष्ट करायला नाझींनी सुरूवात केली. याच त्या दग्धभू लढाया. अशाच एका लढाईत एक संपूर्ण गाव बेचिराख केल्याचं वुल्फगांगने मान्य केलं. या गावात प्रतिकारकांनी आश्रय घेतल्याचा नाझींना संशय होता. ऐन थंडीत नाझींनी सर्वांना घराबाहेर काढलं, पुरूषांची कत्तल केली आणि सगळ्या घरांना आग लावली. निम्म्याहून जास्त स्त्रिया आणि मुलं थंडीने गारठून मरण पावली.
मी जेव्हा त्याच्यासमोर या गोष्टीचा उल्लेख केला तेव्हा माझं बोलणं उडवून लावत तो म्हणाला, " हो! मान्य आहे असं झालं ते पण रशियनांना थंडीची सवय असते! " या कृत्याबद्दल खंत किंवा पश्चात्ताप वाटतो का या प्रश्नावर त्याने हसत हसत हे उत्तर दिलं, " नाही. मला तर उलट आनंद झाला की आमच्या युनिटने हे काम केलं. "

हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की ही मनोवृत्ती वुल्फगांगच्या मनात युद्धामुळे निर्माण झाली नाही, तर तो युद्धात ही मनोवृत्ती घेऊनच उतरला, आणि त्याने आपल्या आधीच काढलेल्या निष्कर्षाचे पुरावे शोधण्याचे प्रयत्न केले. आणि त्याच्या या अशा पूर्वग्रहामुळे त्याने युद्धाचा आनंद उपभोगला. आपण आपल्यासारख्या इतर माणसांवर अत्याचार करतोय किंवा त्यांना ठार मारतोय असा विचारही न करता त्याने आणि त्याच्यासारख्या अनेकांनी युद्धाकडे एक सहल, एक आनंददायी अनुभव म्हणून पाहिलं आणि आधुनिक तंत्रज्ञान आणि युद्धतंत्र यांनी हा आनंद द्विगुणित केला. तोपर्यंत जगाने इतकं तंत्रशुद्ध लष्करी आक्रमण पाहिलंच नव्हतं. युद्धाचं तंत्र अजूनही पारंपारिक होतं - क्रमवार आक्रमण हा नियम जवळजवळ सर्व राष्ट्रांची सैन्यदलं पाळत होती. प्रथम विमानदलाद्वारे बाँबहल्ला, नंतर रणगाडे आणि चिलखती दल आणि शेवटी भूदल हाच क्रम जगभरातल्या लष्करी महाविद्यालयांमध्ये अधिका-यांना शिकवला जात होता. पण नाझींच्या ब्लिट्झक्रीग किंवा विद्युद्वेगी युद्धतंत्राने हे सगळे पारंपारिक सिद्धांत एका क्षणात कुचकामी ठरवले.

हे तंत्र त्यांनी प्रथम पोलंडविरुद्ध वापरलं आणि त्याला यशही मिळालं. नंतर बेल्जियम, लक्झेंबर्ग, नेदरलँडस् इथेही ब्लिट्झक्रीगचा जर्मनांनी यशस्वी वापर केला. पण त्याचं खरं यश त्यांना पहायला मिळालं फ्रान्समध्ये. संख्याबळाने कितीतरी अधिक असलेल्या फ्रान्सला अवघ्या १५ दिवसांत शरण आणून नाझींनी सगळ्या जगाला तोंडात बोटं घालायला लावली. पुढे ग्रीस आणि क्रीटवर ताबा मिळवून जर्मन सैन्याने बाल्टिकपासून भूमध्य समुद्रापर्यंत आख्खा युरोप आपल्या पायाशी आणला. याआधी कोणीही असा पराक्रम गाजवला नव्हता. हे श्रेय निर्विवादपणे ब्लिट्झक्रीग तंत्राचं होतं. त्यामुळे सोविएत रशियाविरूद्ध आघाडी उघडताना त्यांनी याच तंत्राचा वापर केला. क्रमवार आक्रमण या गोष्टीला नाझींनी पूर्णपणे फाटा दिला आणि एका छोट्या बिंदूवर - बरेच वेळा एखादा रस्ता - आपले सगळे प्रयत्न केंद्रित केले. बाँबफेकी विमानं, चिलखती दल, रणगाडे आणि तोफा हे सगळे एकाच वेळी त्या एका बिंदूवर एकवटलेले असत. यात खरं कौशल्य होतं ते या सगळ्या दलांमधल्या समन्वयाचं. जरा जरी त्यात चूक झाली असती तर एका सेनाविभागाने आपल्याच दुस-या विभागाला नष्ट केलं असतं. हे कौशल्य त्या वेळी फक्त जर्मन सेनानींकडे होतं आणि त्यांना त्याचा सार्थ अभिमानही होता. " आमच्या सर्व दलांमध्ये अप्रतिम समन्वय होता, " वुल्फगांग मला अभिमानाने म्हणाला, " आणि आम्हाला त्याचा फायदाही झाला. "

जेव्हा एकापाठोपाठ एक सोविएत शहरं नाझींच्या हातात पडायला लागली तेव्हा त्यांचा हा अभिमान शिगेला पोहोचला आणि त्यावेळी कोणालाही त्यात वावगं वाटलं नाही कारण सोविएत भूप्रदेशात नाझींनी अभूतपूर्व मुसंडी मारली होती. १९४१ चा शरदऋतू सुरु होण्याआधीच त्यांनी ३० लाख रशियन सैनिकांना कैद केलं होतं. ब्लिट्झक्रीग तंत्रामुळे नाझींना शत्रुसैन्याला दोन्ही बाजूंनी कोंडीत पकडणं शक्य होत असे. सप्टेंबर १९४१ मध्ये नाझी सैन्य ६५० किलोमीटर एवढं आत घुसलं होतं. फक्त ३ महिन्यांमध्ये त्यांनी जवळपास सगळा युक्रेन आणि त्याची राजधानी कीव्ह, सगळा बेलारुस (त्यावेळी त्याला श्वेत रशिया असं नाव होतं) आणि त्याची राजधानी मिन्स्क आणि तीन बाल्टिक राष्ट्रे - लिथुआनिया, लाटव्हिया आणि एस्टोनिया - एवढा सोविएत भूभाग पादाक्रांत केला होता. त्याशिवाय लेनिनग्राडला वेढा घातला होता आणि माॅस्कोही त्यांच्या दृष्टिपथात आलं होतं.

नाझी सैन्य त्यावेळी खरोखर आपल्या शिखरावर होतं.  " रेड आर्मी आता कधीच नाझी सैन्याला आव्हान देऊ शकणार नाही " असं हिटलरने बर्लिन स्पोर्टपालास्टमध्ये जाहीर केलं होतं. साधारण त्याच सुमारास वुल्फगांग हाॅर्नने त्याचा वैयक्तिक उन्मादाचा क्षण अनुभवला. माॅस्कोच्या पश्चिमेला १५० मैलांवर व्याझमा इथे जर्मन पँझर आर्मी ३ आणि ४ या युनिट्सनी रशियन सैन्याच्या पाच मोठ्या तुकड्यांना कोंडीत पकडलं. पाचावर धारण बसलेले रशियन सैनिक या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी सैरावैरा पळत होते. काहीजण तर सरळ जर्मन सैन्याच्याच दिशेने गेले, तेही हातात बंदूक किंवा इतर कुठलंही शस्त्र न घेता. " रशियन सैन्याच्या लाटांमागून लाटा आमच्या दिशेने येत होत्या. जेव्हा पहिल्या ओळीतल्या सैनिकांना आम्ही कापून काढलं, मागच्या ओळीतल्या सैनिकांनी मेलेल्या सैनिकांच्या बंदुका उचलल्या आणि त्या घेऊन ते आमच्यावर चाल करून आले. आम्ही त्यांनाही गोळ्या घातल्या. कुठलाही जर्मन सैनिक शत्रूवर नि:शस्त्र हल्ला करणार नाही पण रशियन सैनिकांना काही फरक पडत नसावा. "
एका रात्री व्याझमाजवळ वुल्फगांग आणि त्याच्या सहका-यांची पळून जाणा-या रशियन सैनिकांबरोबर गाठ पडली.  वुल्फगांग नुकताच एका रशियन हातबाँबमुळे जखमी झालेला होता. त्यामुळे त्याला रागही आलेला होता. पळून जाणारे सैनिक पाहिल्यावर त्याने त्यांच्यावर हातबाँब फेकायला आणि गोळीबार करायला सुरूवात केली. " काही सैनिकांच्या बंदुकांना संगिनी लावलेल्या होत्या. अशा लोकांना मी त्याक्षणी गोळ्या घातल्या. "

त्याने आणि त्याच्या सहका-यांनी रशियन सैनिकांनी भरलेल्या एका ट्रकवरही हल्ला केला. हा ट्रक या सगळ्या गोंधळात सटकू पाहात होता. " रशियन सैनिक इतके भित्रे होते की आम्ही हल्ला केल्यावर त्या ट्रकमधले काही सैनिक ट्रकमागे जाऊन जमिनीवर मेल्यासारखे पडून राहिले पण आमच्याशी लढले नाहीत. वुल्फगांग आणि त्याचे सहकारी या सैनिकांजवळ गेले आणि ' हात वर करा ' असं रशियन भाषेत ओरडले. " जेव्हा त्यांनी काही उत्तरच दिलं नाही तेव्हा आम्ही त्यांना गोळ्या घातल्या. ते थोडे थरथरले, आणि शांत झाले. तसंही अशा भित्रट लोकांची हीच लायकी होती." हे सर्व सांगत असताना त्याच्या चेह-यावरचं हास्य कायम होतं, " आम्हा सगळ्यांच्या मनात हाच विचार होता की आम्ही असं कधीच केलं नसतं. " त्या रात्री आपण २०-३० रशियन सैनिकांना ठार मारल्याचं त्याने सांगितलं. त्याच्यासाठी हा त्याचा परमोच्च क्षण होता.

वुल्फगांग हाॅर्न हा कोणी बथ्थड डोक्याचा माणूस व्हता. युद्धानंतर तो शिक्षणक्षेत्रात गेला आणि बुद्धिमत्तामापन चाचण्यांवर त्याने संशोधन केलं. असं असूनही मी जेव्हा त्याला विचारलं की त्याच्यासाठी युद्ध हा थरारक अनुभव का होता, तेव्हा त्याने शांतपणे आणि अभिमानाने हे उत्तर दिलं - ' कारण मी अनेक रशियन सैनिकांना हातबाँब आणि रायफल यांनी मारू शकलो. '

वुल्फगांग हाॅर्नला भेटण्याआधी युद्ध हा भयंकर आणि क्वचितच समाधानकारक असा अनुभव असतो असं मला वाटलं होतं. त्याला भेटल्यावर मला समजलं की काही लोकांना युद्ध, त्यातली हिंसा आणि रक्तपात यांनी आनंदही वाटू शकतो.

 

Monday 27 October 2014

अंधार क्षण - हाजिमे कोंडो

" मी माणूस होतो पण मग मी सैतान बनलो. परिस्थितीने मला सैतान बनवलं." हाजिमे कोंडो मला म्हणाला.
टोकियोमधल्या एका हाॅटेलमध्ये मी त्याची मुलाखत घेत होतो. सैतान म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर जी प्रतिमा येते तिच्याशी हा ८० वर्षांचा वृद्ध माणूस
पूर्णपणे विसंगत होता. पण नंतर त्याची सगळी हकीगत ऐकल्यावर मला त्याचं म्हणणं पटलं.

हाजिमेने ज्या संघर्षात भाग घेतला त्याविषयी दुर्दैवाने लोकांना फार माहीत नाही.
सर्वसामान्यांना दुसरं महायुद्ध म्हटलं की जर्मनीने १९३९ मध्ये पोलंडवर केलेलं आक्रमण हीच त्याची सुरूवात वाटते. पण अनेक इतिहासकार दोन वर्षे आधी म्हणजे १९३७ मध्ये सुरु झालेल्या चीन-जपान युद्धालाही दुस-या महायुद्धातच समाविष्ट करतात. जपानने अमेरिका, ब्रिटन आणि नेदरलँड यांच्याविरूद्ध १९४१ मध्ये युद्ध पुकारलं तेव्हा अमेरिका आणि ब्रिटन यांनी चीनला पाठिंबा दिला आणि त्यामुळे १९४१ च्या पुढचा सर्वच चीन-जपान संघर्ष आज दुस-या महायुद्धाचाच भाग समजला जातो. या युद्धाच्या सुरूवातीला जर्मनीने चीनला आर्थिक पाठिंबा दिला होता पण नंतर  इटली, जर्मनी आणि जपान यांचा ' पोलादी करार ' झाला आणि जपान-जर्मनी एकत्र आले. पहिल्या महायुद्धात इटली आणि जपान हे ब्रिटन आणि फ्रान्स यांच्याबरोबर जर्मनीविरुद्ध लढले होते. जर्मनीच्या वसाहती बळकावणं हा त्यामागचा हेतू होता. पण दोघाही देशांच्या पदरी निराशा आली. विसाव्या शतकात जबरदस्त औद्योगिक प्रगती करणा-या आणि स्वतःला आशियाई अस्मितेचा मानबिंदू समजणा-या जपानला  प्रशांत महासागरातलं युरोपीय देशांचं वर्चस्व मान्य नव्हतं. ते कमी करण्यासाठी आणि चीन, जपान आणि प्रशांत महासागरातील बेटं यांचं जपानी साम्राज्य स्थापन करणं ही आपली जुनी महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी जुलै १९३७ मध्ये जपानच्या क्वान्टुंग आर्मीने चीनच्या मांचुरिया प्रांतावर हल्ला चढवला. डिसेंबर १९३७ मध्ये चीनची तेव्हाची राजधानी नानकिंग जपानच्या हातात पडली आणि नंतर जवळजवळ एक महिना जपान्यांनी नानकिंगमध्ये लूटमार, जाळपोळ आणि बलात्कार यांचं अभूतपूर्व थैमान घातलं. या हत्याकांडाला थोडीफार प्रसिद्धी मिळाली असेल पण चीन-जपान युद्धातल्या महत्वाच्या घटना लोकांपुढे आल्याच नाहीत. चिनी आणि जपानी सरकारांनीही बरीचशी माहिती दडपली आणि प्रसिद्ध होऊ दिली नाही.
२००० साली मला चिनी सरकारने नानकिंग हत्याकांडातून वाचलेल्या व्यक्तींच्या मुलाखती घेण्याची परवानगी दिली. पण जेव्हा आम्ही प्रत्यक्ष मांचुरियामध्ये चित्रीकरण करण्याची परवानगी मागितली तेव्हा ती मिळाली नाही. चीन आणि जपान यांचे आजचे संबंध हे गुंतागुंतीचे आहेत. एकीकडे चिनी सरकार आणि प्रसारमाध्यमे जपानवर दुस-या महायुद्धातल्या अत्याचारांबद्दल टीका करतात पण त्याच वेळी जपानी तंत्रज्ञान आणि गुंतवणूक हेही त्यांना हवं आहे. जपानमध्ये तर अगदी विद्यापिठांमधले विद्वानही जपानी सैनिकांनी चिन्यांवर केलेल्या अत्याचारांबाबत मौन तरी पाळतात किंवा तो मुद्दाच झटकून टाकतात. एखाद्या जर्मन प्राध्यापकाने आॅशविट्झबद्दल असं वागायचा प्रयत्न केला तर पाश्चिमात्य देशांत ते सहनच केलं जाणार नाही.

या सगळ्या अनास्थेचा परिणाम म्हणजे इतिहासाचा हा भाग अजूनही दुर्लक्षित आहे. जपान्यांनी किती चिनी लोकांचे बळी घेतले हेच कुणाला माहीत नाही. दीड ते दोन कोटी असा एक अंदाज आहे. आणि आता हे युद्ध अनुभवलेले खूपच कमी लोक हयात आहेत - चीनमध्येही आणि जपानमध्येही.

मला भेटलेला हाजिमे कोंडो हा एक अपवाद - आपले अनुभव सांगायला तयार असलेला जपानी सैनिक.

एका गरीब शेतक-याच्या घरी जन्माला आलेला  हाजिमे १९४० मध्ये सैन्यात भरती झाला. पहिल्या दिवसापासून त्याच्या वरिष्ठांनी योजनाबद्ध रीतीने त्याला आणि त्याच्याबरोबर भरती झालेल्या इतर सैनिकांना छळायला सुरूवात केली. कधीकधी ही छळवणूक अत्यंत पाशवी पातळीवर जात असे.        " आमचं सैनिकी प्रशिक्षण हे खूप कठोर होतं. त्यापेक्षा मरणं परवडलं. कोणतीही चूक, मग ती कितीही क्षुल्लक असो, आमचे वरिष्ठ लाथाबुक्क्यांनी बडवून काढायचे. "
जगभरात नवीन सैनिकांचं ' रॅगिंग ' होतं, पण हे ते नव्हतं. ही जपानी सैन्याची सैनिकांना मानसिक दृष्ट्या तयार करण्याची पद्धत होती. मी जपानी सैन्यातल्या इतर सैनिकांकडूनही अशीच वर्णनं ऐकली आहेत. कधी सैनिकांनाच एकमेकांना मारून ' शिक्षा ' करायला सांगण्यात येत असे. गटातल्या एकाने काही चूक किंवा गुन्हा केला तर सर्वांना त्याचे परिणाम भोगावे लागत. " सैन्यात जबाबदारी ही वैयक्तिक नसते तर सामूहिक असते, " तो मला म्हणाला,  " त्यामुळे कधी कधी तुम्हाला तुमची काहीही चूक नसतानाही शिक्षा भोगायला लागते. "
अशा प्रशिक्षणाचा परिणाम म्हणजे सैनिक नियम अगदी कसोशीने पाळायचे आणि तेही कुठलाही प्रतिप्रश्न न विचारता. असे आज्ञाधारक आणि स्वतःची बुद्धी न चालवणारे सैनिक तयार करणं हाच तर जपानी सैन्याचा हेतू होता.

हाजिमेला चीनमध्ये पाठवण्यात आलं आणि त्याने आपलं प्रशिक्षण तिथे चिनी युद्धकैद्यांवर  ' प्रात्यक्षिक ' करुन पूर्ण केलं.
" एक दिवस माझा प्रशिक्षक मला म्हणाला की आज आपण संगीन कशी वापरायची ते शिकू या. आमच्या समोर झाडांना चिनी युद्धकैद्यांना बांधून ठेवलं होतं. प्रशिक्षकाने  आम्हा प्रत्येकाच्या हातात एक संगीन लावलेली रायफल दिली आणि सांगितलं की जोरात धावत या आणि या बांधून ठेवलेल्या कैद्याच्या पोटात ही संगीन खुपसा. माझे हातपाय थरथरत होते. मला मी ते कसं केलं ते आठवत नाही पण मी धावत आलो आणि त्या कैद्याच्या पोटात संगीन खुपसली. तो मेला. तोपर्यंत मला भीती वाटत होती पण त्यानंतर काहीच वाटलं नाही. मला आत्मविश्वास वाटू लागला की प्रत्यक्ष युद्धातही मी हे करू शकेन. माणसाला मारणं खरंच किती सोपं आहे! "
मी मुलाखत घेतलेल्या इतर जपानी सैनिकांनीही साधारण अशाच कथा मला ऐकवल्या. कुणालाही चिनी युद्धकैद्यांचे प्राण घेतल्याचा जराही पश्चात्ताप झाला नव्हता. त्याचं एक कारण म्हणजे त्यांचं प्रशिक्षण. पण त्याचबरोबर हेही खरं आहे की त्यांना असं सुरूवातीपासून सांगितलं गेलं होतं की चिनी लोकांचा दर्जा हा तुमच्यापेक्षा खालचा आहे.
" आमच्या शाळेत, अगदी बालवर्गापासून आम्हाला हेच सांगितलं जायचं की चिनी लोक गरीब आहेत, हलक्या जातीचे आहेत. त्याउलट जपानी लोक देवाचे लाडके आहेत. त्यांचा वंश हा जगातला सर्वोत्तम आहे पण चिनी लोक डुकरापेक्षाही खालच्या दर्जाची जनावरं आहेत. अगदी लहानपणापासून आमची हीच मनोवृत्ती होती. "
जर्मनी आणि जपान ह्या दोन्ही देशांमध्ये औद्योगिक क्रांती ब्रिटन आणि फ्रान्सच्या मानाने उशिरा झाली. त्यामुळे त्यांना आपली जगभर पसरलेली वसाहतींची साम्राज्यं स्थापन करता आली नाहीत. पण ही साम्राज्यकांक्षा दोन्हीही देशांमध्ये होती. " आम्हाला असं सांगितलं जायचं की मांचुरियामधून आम्हाला धान्य मिळेल आणि उत्तर चीनमधून कोळसा आणि कापड. अशा प्रकारे जपान अधिकाधिक श्रीमंत आणि बलवान होईल. "
आपलं साम्राज्य वाढवण्यासाठी जपानी सैन्याने नानकिंगवरुन पुढे अजून उत्तरेला आगेकूच केली आणि एकामागोमाग एक चिनी शहरं आपल्या अंमलाखाली आणायला सुरूवात केली. १९४० मध्ये हाजिमे कोंडो प्रशिक्षण पूर्ण करुन युद्धआघाडीवर दाखल झाला. त्यावेळी चीनचा उत्तरेकडचा एक मोठा हिस्सा जपानने बळकावला होता. हाजिमेची नेमणूक शांक्सी प्रांतातल्या एका युनिटमध्ये झाली.
" तिथे तुम्हाला काहीही करायची मोकळीक होती, " तो मला म्हणाला, " आम्हाला कोणीही असं स्पष्टपणे सांगितलं नव्हतं पण आमच्या वरिष्ठांना तसं करताना बघून मग आम्हीही त्यांचं अनुकरण करायला सुरूवात केली. आम्ही जे केलं ते एक गट म्हणून केलं. त्यामुळे आम्हा कोणावरही वैयक्तिक जबाबदारी नव्हती. सर्वजण सगळ्या गोष्टींना समान जबाबदार होते. आम्हाला हे सांगण्यात आलं होतं की कम्युनिस्ट हे सम्राटाचे शत्रू आहेत, त्यांना मारायलाच पाहिजे.  जर एखाद्या चिन्याला तुम्ही मारलंत तर ते सम्राटाची सेवा केल्यासारखंच आहे. जेवढे जास्त चिनी तुम्ही माराल, तेवढी जास्त सेवा! "
मला यात आणि जर्मन सैनिकांच्या वर्तणुकीत प्रचंड साम्य आढळलं. जर्मन सैनिकांनीही ' फ्युहरर ' च्या नावाने अशीच हजारो रशियनांची कत्तल केली. अजून एक साम्य म्हणजे रशियामध्ये जरा जरी प्रतिकार झाला तरी जर्मन सैनिक लगेच ' सूड ' या नावाखाली गावंच्या गावं उध्वस्त करत असत. इथे चीनमध्ये जपानी सैनिकांनीही तेच केलं.

ह्या सगळ्या गोष्टी - चिनी लोक वांशिकदृष्ट्या हीन आहेत हा ठाम विश्वास, राक्षसी साम्राज्यकांक्षा, सम्राटाच्या नावाने कुठलेही अत्याचार करायला तयार असलेलं सैन्य आणि सैनिकांच्या मनात सतत जागृत असलेली सूडाची भावना - हे एक भयंकर जहरी आणि विखारी मिश्रण होतं आणि चिनी नागरिकांना दुर्दैवाने त्याचे परिणाम भोगावे लागले.

हाजिमे कोंडोच्या हकिगतीवरून जपानी सैन्याने अत्याचार हे उत्तर चीनचा ग्रामीण भाग ताब्यात घेण्यासाठी  लष्करी डावपेच म्हणून वापरले हे आपल्या लक्षात येतं. सर्वप्रथम त्याची तुकडी गावातल्या काही लोकांना पकडून त्यांच्याकडून गावाबद्दल माहिती मिळवत असे. या खेडुतांवर स्वाभाविकपणे अत्याचार होत असत. माहिती मिळाल्यावर सैनिक त्यांना मारून टाकत. " पण आम्ही कधीही आमच्या गोळ्या किंवा तलवारी त्यांना मारायला वापरत नसू. डोक्यात एक दगड घालून मारण्याचीच या चांकोरोंची लायकी होती. "
(चिनी लोकांसाठी जपानी सैनिक ' चांकोरो ' हा  शब्द वापरत. ही खरंतर शिवी आहे, जिचा अर्थ आहे डुक्कर. )
मिळालेल्या माहितीच्या आधारे हे सैनिक मग गावात घुसत. " गावात शिरल्यावर आम्ही लोकांच्या घरात जायचो आणि पैसे, धान्य वगैरे मिळेल ते लुटायचो. मग नंबर यायचा बायकांचा. जवळजवळ दहा ते तीस सैनिक - एका बाईबरोबर! "

नाझी जर्मनीने सोविएत रशियावर केलेल्या आक्रमणात स्त्रियांवर बलात्कार झाले नाहीत असं नाही, पण त्यांचं प्रमाण नगण्य होतं. चीन-जपान युद्धात मात्र सगळीकडे बलात्कार झाले. जर्मन सैनिकांनी रशियन स्त्रियांवर बलात्कार न करण्याचं कारण होतं त्यांचा वंश. नाझी विचारसरणीनुसार ज्यू किंवा स्लाव्ह स्त्रीबरोबर आर्यन पुरुषाचा शारीरिक संबंध म्हणजे महाभयंकर पाप. जपानी सैनिकांनी मात्र चिनी लोक वांशिक दृष्ट्या हीन असल्याचा बरोबर उलटा अर्थ लावला होता.

हाजिमे कोंडो स्वतः अशा एका सामूहिक बलात्कारात सहभागी होता. त्याच्या हकिगतीवरून आपल्याला कळतं की निव्वळ लैंगिक वासनातृप्ती हा या बलात्कारांचा हेतू नव्हता. त्याच्याशिवाय अजून काही कारणं होती.
त्याने सांगितलं की बलात्कार करणारे सैनिक हे युनिटमधले ज्येष्ठ , अनुभवी असे लोक असत. ' नवख्या ' सैनिकांना ही संधी मिळत नसे. जपानी समाजाप्रमाणेच सैन्यातही अत्यंत कडक अशी श्रेणीबद्ध रचना होती आणि ज्येष्ठ सैनिक आपल्या कनिष्ठ सैनिकांना नोकराप्रमाणे वागवत असत. " ते आमच्याशी इतक्या तुसडेपणाने वागत असत की त्यांची बरोबरी करण्याचा विचारही मी कधी केला नव्हता. "

पण ही सगळी परिस्थिती एक दिवस बदलली. हाजिमेने एव्हाना चीनमध्ये तीन वर्षे पूर्ण केली होती. एका गावावर त्याच्या तुकडीने धाड टाकली आणि त्यात त्यांच्या तावडीत एक तरूण स्त्री सापडली. आळीपाळीने तिच्यावर त्यांनी बलात्कार केला. त्यावेळी एका चार वर्षे पूर्ण केलेल्या (आणि म्हणून हाजिमेला ज्येष्ठ असलेल्या) सैनिकाने  त्याला बोलावलं, " ये इकडे आणि घे हिला! "

हे ' आमंत्रण ' ऐकल्यावर हाजिमेच्या मनातला पहिला विचार होता - ' हे आपण नाकारू शकत नाही! ' एक प्रकारे हे आमंत्रण म्हणजे ज्येष्ठ सैनिकांनी त्याला आपल्यातला मानल्याची पावती होती. कदाचित यामुळे पुढे त्याला फायदा होऊ शकला असता. या बलात्कारात लैंगिक भाग फारच कमी होता. हाजिमेसाठी ही एक प्रकारची निवडचाचणी होती. जवळजवळ २० सैनिकांनी त्या स्त्रीवर बलात्कार केला, पण हाजिमेला तिचं नंतर काय झालं हे आज आठवत नव्हतं. तसंही जपानी सैनिक आपलं काम पूर्ण झाल्यावर अशा स्त्रियांना ताबडतोब मारून टाकत.

एक प्रसंग मात्र त्याला आठवत होता. त्यावेळी एक अपवादात्मक गोष्ट घडली होती. बलात्कार झाल्यावर ठार मारण्याऐवजी जपानी सैनिक त्या स्त्रीला चालवत दुस-या गावाकडे घेऊन जात होते. पायातल्या बुटांशिवाय तिच्या अंगावर काहीही कपडे नव्हते आणि तिने आपलं तान्हं मूल उराशी घट्ट धरलं होतं. रस्ता ब-यापैकी डोंगराळ आणि चढ-उताराचा होता त्यामुळे ती थकली होती. तिला चालवत नव्हतं. तिची कशी ' विल्हेवाट ' लावावी याबद्दल सगळे सैनिक बोलत होते. " अचानक आमच्यातला एकजण उठला, त्याने तिच्याकडून तिचं मूल हिसकावलं आणि खाली दरीत फेकून दिलं. दरी जवळजवळ ३०-४० मीटर तरी खोल असेल. मुलाला फेकून दिल्यावर तिने ताबडतोब त्याच दरीत स्वतःला झोकून दिलं. हे सगळं माझ्या डोळ्यांसमोर घडलं. माझ्या मनात त्यावेळी हे सगळं किती भयानक आहे असा विचार आला आणि त्या स्त्रीसाठी वाईटही वाटलं पण मी तो विचार बाजूला सारला. "
जेव्हा त्या जपानी सैनिकाने त्या मुलाला दरीत फेकलं तेव्हा त्याच्या मनात नक्की काय विचार असतील? नसती ब्याद बरोबर घेण्याऐवजी तिची विल्हेवाट लावण्याची इच्छा? स्वतःच्या ताकदीचं प्रदर्शन? चिन्यांविषयी वाटणारा तिरस्कार? का पेट्रास झोलिओंकाला वाटली होती तशी उत्सुकता?  मला वाटतं कदाचित या सगळ्या गोष्टी! 

आपण स्वतः एकाच बलात्कारात सहभागी होतो असं हाजिमे कोंडो मला म्हणाला आणि हे खरं असण्याची शक्यता आहे कारण यानंतर लगेचच त्याच्या तुकडीला ओकिनावा बेटावर पाठवण्यात आलं. तिथे तो अमेरिकन सैनिकांच्या हातात पडला आणि युध्दकैदी झाला. युद्ध संपल्यावर काही काळ जपानवर अमेरिकन सैन्याचं नियंत्रण होतं. जेव्हा हे नियंत्रण संपुष्टात आलं आणि जपान परत जपानी सरकारच्या नियंत्रणाखाली आला तेव्हा त्याची सुटका झाली.

कैदेत असताना आणि त्यानंतरही हाजिमे कोंडोने त्याने जे पाहिलं, अनुभवलं आणि केलं त्यावर भरपूर विचार केला होता. त्याचे निष्कर्ष त्याने मला आमच्या मुलाखतीच्या शेवटी सांगितले - ' जर तुम्ही रणांगणात एक वर्ष काढलंत तर अशा गोष्टी सहन करु शकता पण आम्ही तीन वर्षे तिथे काढली. अशावेळी तुम्हाला वेड लागल्यासारखंच होतं. चांगल्या-वाईटाचे विचार तुमच्या नात येईनासे होतात. शांततेच्या काळात तुम्ही कल्पनाही करु शकणार नाही अशा गोष्टी आणि कृत्यं तुम्ही युद्धात अगदी सहजपणे करता कारण तिथलं वातावरण वेगळं असतं. प्रत्येकजण तिथे पशू बनतो. जर तुम्ही सुशिक्षित असाल तर कदाचित तुमचं सैतानात रुपांतर होणार नाही पण मी सुशिक्षित नव्हतो. प्रत्येक माणसाने आपली विचार करण्याची शक्ती कायम ठेवायला हवी. नाहीतर माझ्यासारखीच तुमची गत होईल. '