Saturday 15 November 2014

अंधार क्षण - ल्युसिल आयशेनग्रीन

पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन आणि त्यामुळे होणारा शारीरिक आणि मानसिक हिंसाचार हा फक्त नाझीच करत होते असं अजिबात नाही. त्याचप्रमाणे अडचणीत सापडलेल्या लोकांचा गैरफायदा घेणं यावरही फक्त नाझींची मक्तेदारी नव्हती. ल्युसिल आयशेनग्रीनला या दोन्ही गोष्टींचा जो अनुभव आला त्यावरून मी म्हणेन की जे तिला सहन करावं लागलं तशी वेळ फार कमी लोकांवर आली असेल आणि सर्वात भयावह म्हणजे जेव्हा तिला हे सगळं पहावं लागलं तेव्हा ती फारच लहान होती - ती ८ वर्षांची असताना या गोष्टींची सुरूवात झाली आणि जेव्हा त्यांचा अंत झाला तेव्हा ती फक्त २० वर्षांची होती. एवढ्या लहान वयात जेव्हा असे अनुभव येतात तेव्हा माणसाचं व्यक्तिमत्त्व पूर्णपणे बदलून जातं. 

मी जेव्हा तिची मुलाखत घेतली तेव्हा ती सत्तरीच्या घरात होती पण काळाने आणि अनुभवांनी तिच्या सौंदर्याला अजिबात धक्का लावला नव्हता. माझ्या विनंतीला मान देऊन ती पोलंडमधल्या क्रॅको शहरात मुलाखतीसाठी आली. या छोट्या चणीच्या, देखण्या आणि इंग्लिशशिवाय इतर अनेक भाषांवर प्रभुत्व असलेल्या स्त्रीच्या मुलाखतीनंतर मी अस्वस्थही झालो आणि भारावूनही गेलो.

" माझा जन्म १ फेब्रुवारी १९२५ या दिवशी हँबर्ग, जर्मनी  इथे झाला. माझे वडील बेंजामिन लँडाउ यांचा वाईन्सच्या आयात-निर्यातीचा व्यवसाय होता आणि तो चांगला चालत होता. " हँबर्गच्या उच्च मध्यमवर्गीय भागात ल्युसिल तिच्या आईवडील आणि धाकट्या बहिणीबरोबर राहात होती. त्यांचं घर खूप मोठं होतं.

" १९३३ पर्यंत (नाझी सत्तेवर येईपर्यंत) आयुष्य अत्यंत मजेत, उत्साहात आणि निवांतपणे चाललं होतं. आम्ही भरपूर प्रवास करायचो. डेन्मार्क, फ्रान्स, पोलंड हे देश मी लहानपणीच पाहिले. मला टेनिस आणि घोडेस्वारी आवडायची. शिवाय इंग्लिश शिकवण्यासाठी घरी शिक्षक यायचे. "

ल्युसिलचे आईवडील दोघेही पोलिश ज्यू होते आणि घरात जरी सगळेजण एकमेकांशी अस्खलित जर्मन भाषेत बोलत असले तरी ल्युसिलला आपल्या पोलिश पार्श्वभूमीची माहिती होती. " मी स्वतःला पोलिश समजत असे कारण माझ्याकडे पोलिश पासपोर्ट होता. पण मला पोलिश भाषा समजत नसे. जेव्हा आईबाबांना एखादी गोष्ट आम्हाला समजू नये असं वाटत असे तेव्हा ते पोलिश किंवा फ्रेंचमध्ये बोलत असत. " आपल्या पोलिश पार्श्वभूमीबद्दल तिला त्या वेळी जरी काही वाटत नसलं तरी नंतरच्या काळात या गोष्टीला खूपच महत्त्व येणार होतं.

३० जानेवारी १९३३ या दिवशी, म्हणजे ल्युसिलच्या ८व्या वाढदिवसाच्या २ दिवस आधी, अॅडाॅल्फ हिटलरला जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष पाॅल हिंडेनबर्ग यांनी जर्मनीचा पंतप्रधान (चॅन्सेलर) म्हणून नियुक्त केलं. ल्युसिल आणि तिच्या बहिणीला त्याचा परिणाम लगेचच जाणवला. " आमच्या शेजारी राहणा-या मुलांनी आमच्याशी खेळणं किंवा बोलणं बंद केलं. त्यातले बरेच जण हिटलर युवा (जर्मन भाषेत Hitler Jugend किंवा HJ) संघटनेचे गणवेष घालून फिरायला लागले. आम्ही कुठेही जात असलो तर ही आणि इतर मुलं आम्हाला शिवीगाळ करायला लागली. काही जण तर आमच्यावर दगडदेखील मारत असत. मला आणि माझ्या बहिणीला हे समजत नव्हतं की आम्ही असं काय केलंय की सगळे आमच्याशी असं वागताहेत? आणि जेव्हा मी घरी हा प्रश्न विचारायचे तेव्हा त्यांचं एक ठराविक उत्तर असायचं - हेही दिवस जातील. शेवटी सगळं ठीक होईल. "

ल्युसिल आणि तिच्या बहिणीचं बालपण एका क्षणात उध्वस्त झालं. दोघींनाही त्यांच्या आईवडिलांनी अशी सक्त ताकीद दिली की लोकांचं लक्ष तुमच्याकडे वेधलं जाईल असं काहीही करू नका. बसने जाताना रांगेत शेवटी उभ्या राहा. मोठ्या आवाजात बोलू किंवा हसू नका.

त्यांच्या घरापासून शाळा जवळजवळ पाऊण तासाच्या अंतरावर होती. हा पाऊण तास म्हणजे एक कठीण सत्वपरीक्षा व्हायला लागली. इतर मुलं त्यांना दगड मारत, त्यांच्यावर थुंकत आणि प्रौढ लोक पाहून न पाहिल्यासारखं करत. " मला कोणाला साधे प्रश्न विचारायचीही भीती वाटायची. न जाणो त्यांनी काही विपरीत अर्थ काढला तर? कदाचित मला शिक्षाही होऊ शकली असती.  मी माझ्या सभोवताली असलेल्या वातावरणाच्या बाबतीत एकदम सजग आणि सावध झाले आणि लहान मुलांसाठी ही फार विचित्र गोष्ट आहे. अशा त-हेची विचारसरणी ही अनुभवाने येते. कोणीही तसा जन्माला येत नाही. त्यामुळे माझं बालपण असं काही राहिलंच नाही. मी आणि माझी बहीण अकाली प्रौढ झालो. "

१९३३ मध्ये सत्ता हातात आल्यावर नाझींनी अत्यंत योजनाबद्ध रीतीने ज्यूंना सार्वजनिक जीवनातून हद्दपार करायला सुरूवात केली. ज्यू विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयांचे दरवाजे बंद झाले आणि ज्यू मुलांनी इतर ' आर्यन ' मुलांबरोबर खेळण्यावर बंदी घालण्यात आली. जेव्हा नाझींनी जर्मनीत राहणा-या ज्यूंचं नागरिकत्व तपासायला सुरुवात केली तेव्हा ल्युसिल पोलिश आहे हे सत्य बाहेर आलं. आता तिला इतर ज्यू मुलांकडूनही त्रास व्हायला लागला , " ही मुलं म्हणायची की पोलिश ज्यू मूर्ख, घाणेरडे आणि गरीब असतात आणि त्यांनी जर्मनीत राहता कामा नये. जेव्हा तुम्ही असल्या गोष्टी वयाच्या १०-१२ व्या वर्षी ऐकता तेव्हा त्याचा मनावर खूप खोलवर परिणाम होतो. सगळेजण माझ्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करायचे आणि अशी कुत्सित शेरेबाजी करायचे. "

तिच्या कुटुंबाच्या पोलिश असण्याचा फटका तिच्या वडलांना फार वाईट प्रकारे बसला. जर्मनीने पोलंडवर आक्रमण केलं त्याच दिवशी त्यांना शत्रूराष्ट्राचा नागरिक म्हणून अटक करण्यात आली आणि त्यांची रवानगी म्युनिकजवळ असलेल्या डाखाऊ छळछावणीत करण्यात आली. त्यानंतर जवळजवळ दीड वर्षांनी दोन गेस्टापो सैनिक ल्युसिलच्या घरी आले, " त्यांनी एक सिगार बाॅक्स टेबलावर फेकली. ती फुटून आतमधली राख बाहेर पसरली. ' हा घ्या बेंजामिन लँडाउ ! ' ते म्हणाले आणि हसतहसत आल्या पावली निघून गेले. आता ती खरंच माझ्या बाबांची राख होती की शवदाहिनीमध्ये प्रेतं जाळल्यावर जमा झालेली राख होती - आम्हाला कधीच कळणार नव्हतं. बाबांच्या मृत्यूने आमच्यावर प्रचंड आघात झाला. विशेषतः माझ्या आई आणि बहिणीवर. दोघीही अत्यंत अबोल झाल्या. आई कुठेतरी शून्यात नजर लावून बसलेली असे. शेजारी बहीणही तशीच बसलेली असे. तासंतास दोघीही अशाच न बोलता बसत. बाबा आता परत आम्हाला कधीच दिसणार नाहीत हे मान्य करणं खरंच खूप कठीण होतं. "

आपले वडील नाझींच्या छळछावणीत मरण पावले हे जेव्हा ल्युसिलला कळलं तेव्हा ती १६ वर्षांची होती.
" माझ्या मनात त्यावेळी प्रचंड तिरस्कार दाटून आला. कुठलाही गुन्हा न केलेल्या माझ्या बाबांना त्यांनी ज्या थंडपणे मारलं त्याच्याबद्दलचा संताप माझ्या मनात अजूनही आहे. मी बायबल वाचलं होतं आणि त्यातली ' तुम्ही कोणाचीही हत्या करणार नाही (Thou shalt not kill)'  ही आज्ञा माझ्या लक्षात होती. त्यामुळे नाझींनी माझ्या वडिलांना मारणं मी समजू शकले नाही. मी जे वाचलं होतं त्यावर विश्वास ठेवण्याएवढी भोळी नक्कीच होते. आयुष्य ही पुस्तकात लिहिलंय त्यापेक्षा फार वेगळी गोष्ट आहे याची मला तेव्हा जाणीव नव्हती. "

यानंतर जवळजवळ ८ महिन्यांनी नाझींनी ल्युसिल, तिची आई आणि बहीण यांना इतर हजारो ज्यूंबरोबर पोलंडमधल्या लोड्झ शहरातल्या घेट्टोमध्ये ' स्थलांतरित ' केलं. यावेळी नाझी जर्मनीला ' ज्यू मुक्त ' करण्याचा प्रयत्न करत होते. मृत्युछावण्यांमध्ये औद्योगिक स्तरावर ज्यूंना मारणं अजून सुरु व्हायचं होतं.

नाझी सैनिक हँबर्गमधल्या ज्यूंना जेव्हा हँबर्ग रेल्वे स्थानकाकडे घेऊन चालले होते तेव्हा ल्युसिलने ही ' मिरवणूक ' पहायला उभ्या असलेल्या इतर लोकांच्या चेह-यावरचे भाव पाहिले, " निर्विकार!  काहीही भावना नव्हत्या त्यांच्या चेह-यांवर! काही लोकांनी शिव्या हासडल्या पण बहुतेक लोकांनी आमच्याशी नजर न मिळवणं पसंत केलं. मला कुणाच्याही चेह-यावर आमच्याविषयी कीव किंवा दयेचे भाव दिसले नाहीत. " ल्युसिल अजूनही हे विसरलेली नव्हती, " तेव्हा माझ्या मनात एकच विचार आला - तुमचीही वेळ येईल कधीतरी! "

हँबर्गमधून निघालेल्या गाडीला पोलंडमधील लोड्झ शहरात पोचायला बरेच दिवस लागले. मध्ये जिथे जिथे गाडी थांबली, तिथे गाडीत नवीन लोक चढवले गेले. शेवटी जेव्हा गाडी लोड्झला पोचली तेव्हा त्यांच्यातले काहीजण गुदमरून मरण पावले होते.
जे जिवंत होते त्या सगळ्यांना नाझींनी लोड्झ घेट्टोमध्ये पाठवलं.

" जेव्हा आम्ही घेट्टोमध्ये शिरलो तेव्हा आम्हाला धक्काच बसला. तिथले लोक अस्वच्छ, थकलेले आणि निरूत्साही दिसत होते. त्यांनी आमच्याकडे लक्षही दिलं नाही. रस्ते ठिकठिकाणी उखडलेले होते आणि त्यांच्यावर केरकचरा पसरलेला होता. गटारांमधून सांडपाणी वाहात होतं. तिथल्या इमारती जुन्या, मोडकळीला आलेल्या वाटत होत्या. याआधी आमच्यापैकी कोणीही हँबर्गमधली झोपडपट्टी पाहिली नव्हती पण ती अशीच असणार असं मला घेट्टोकडे बघून वाटलं. तिथे राहणारे हे लोक असे का दिसताहेत तेही मला कळत नव्हतं. इथे राहायचं या विचारानेच अंगावर शहारा आला. "

नाझी सैनिकांनी या सर्व ज्यूंना घेट्टोमध्ये सोडलं आणि ते निघून गेले. या लोकांना मिळेल तिथे आसरा घ्यावा लागला. तिथल्या एका बंद पडलेल्या शाळेच्या खोलीत ल्युसिल आणि तिच्या कुटुंबाने राहायला सुरुवात केली. नंतर ते एका थोड्या मोठ्या खोलीत राहायला गेले पण तिथे त्याआधीच दोन कुटुंबं राहात होती. अन्नाची कमतरता हा तर एक मोठा प्रश्न होता, " नाझींनी ज्यूंना पूर्णपणे हतबल करायचंच ठरवलं होतं. त्यामुळे आम्हाला मिळणारं अन्न हे कधीही पुरेसं नसायचं. दूध, मांस, फळं या गोष्टी तर कधीच मिळाल्या नाहीत. "

ल्युसिलला जर्मनीमध्ये पोलिश पासपोर्ट असल्यामुळे अडचणी आल्या होत्या. इथे पोलंडमध्येही तिला पोलिश ज्यूंनी आपल्यात सामावून घेतलं नाही. " एकतर मला पोलिश भाषा नीट येत नव्हती. दुसरं म्हणजे मी जर्मनीहून आले होते. जर्मन ज्यूंसाठी मी पोलिश होते आणि पोलिश ज्यूंसाठी जर्मन. "

जर्मनीहून आलेल्या या ज्यूंचं तिथल्या पोलिश ज्यूंनी स्वागत वगैरे केलं नाही कारण दोघांच्याही मनात एकमेकांविषयी अनेक पूर्वग्रह होते. " जर्मन ज्यूंनी आल्याआल्या पोलंड आणि लोड्झ घेट्टो यांच्यावर टीका केली आणि पोलिश ज्यूंना गोष्टी कशा ' सुधरवता ' येतील हे शिकवण्याचा प्रयत्न केला, जे त्यांना साहजिकच आवडलं नाही. कुणाला आवडेल? तुम्ही दुस-यांच्या घरात जाऊन त्यांची शिस्त बदलण्याचा प्रयत्न केला तर खटके उडणारच!"

लोड्झ घेट्टोमधून मृत्युछावणीत ' स्थलांतरित ' होणा-या ज्यूंची पहिली यादी लोड्झ घेट्टोमधल्या नियामक मंडळाने (जर्मन भाषेत Judenrat) बनवली होती. या यादीत प्रामुख्याने जर्मन ज्यूंचा समावेश होता. ल्युसिल, तिची बहीण आणि आई या तिघींचीही नावं त्यात होती. हे कळल्यावर ल्युसिलचं धाबं दणाणलं. तिने घेट्टोमधल्या सगळ्या कार्यालयांमध्ये तिघींचे पासपोर्ट घेऊन असंख्य फे-या मारल्या आणि आपली नावं त्या यादीमधून काढून टाकावीत म्हणून अनेक जणांचे पाय धरले. ' स्थलांतर ' चा नाझी अर्थ मृत्युछावणी आणि गॅस चेंबर आहे हे तिला त्यावेळी माहित नव्हतं. एव्हाना १९४२ हे वर्ष चालू झालं होतं आणि एस्.एस्. ला हिटलरकडून ' ज्यूविषयक प्रश्नांचं अंतिम उत्तर ' मिळालं होतं. ज्यूंच्या हत्याकांडासाठी नाझींनी हेच शब्द (जर्मन भाषेत Endlosung der Judenfrage किंवा The Final Solution of the Jewish Problem) वापरले होते. ल्युसिलला जरी स्थलांतराचा अर्थ माहीत नसला तरी आपण घेट्टोमध्ये जास्त सुरक्षित आहोत असं तिला वाटत होतं. कशीतरी तिने घेट्टोतल्या नियामक मंडळाची आपण पोलिश असल्याबद्दल खात्री पटवली आणि घेट्टोमध्ये राहण्याची परवानगी मिळवली.

पण हा सगळा ताण सहन करणं तिच्या आईच्या ताकदीबाहेर होतं, " आईचा आयुष्यातला रस संपला होता. ती काहीच काम करू शकत नव्हती. अन्नाच्या अभावी तिचं सगळं शरीर सुजलं होतं आणि शरीरात पाण्याचा संचय झाला होता. तिला नीट चालताही येत नव्हतं. शेवटी १३ जुलै १९४२ या दिवशी ती मरण पावली. आमच्या घेट्टोमध्ये एक काळी घोडागाडी शववाहिनी म्हणून वापरत असत. दररोज सकाळी ही गाडी संपूर्ण घेट्टोमध्ये प्रेतं गोळा करत फिरत असे. त्या दिवशी ती माझ्या आईला घेऊन गेली. नंतर एक आठवडा झाला पण दफनविधी झाला नाही. ज्यूंमध्ये मृत्यूच्या दुस-याच दिवशी दफनविधी करावा लागतो. शेवटी मी आणि माझ्या बहिणीने एक रिकामी जागा शोधली, खड्डा खणला आणि दफनविधीची तयारी केली. आम्हाला शवपेटी मिळाली नाही. शेवटी दफनभूमीच्या जवळ असलेल्या एका उजाड घरातून आम्हाला दोन मोठे लाकडाचे तुकडे आणि दोरखंड मिळाले. त्या दोन तुकड्यांच्या मध्ये आम्ही तिला बांधलं.
हे सगळं आम्ही अत्यंत यांत्रिकपणे करत होतो. कसं केलं ते आता आठवत नाही. आमच्या डोळ्यांमधून अश्रू वाहात नव्हते एवढं आठवतं. आम्ही दोघीही बधिर झालो होतो. तिला पुरल्यावर आम्ही प्रार्थना वगैरे न म्हणता तिच्यावर माती लोटली आणि आमच्या खोलीमध्ये परत आलो.
माझ्या बहिणीवर या सगळ्याचा खूप खोलवर परिणाम झाला. मुख्य म्हणजे तिचं बोलणं बंद झालं. ती दिसायला सुंदर होती, हुशार होती पण आता बोलण्यासारखं काहीच राहिलं नव्हतं. मी आईला तिची काळजी घेईन असं वचन दिलं होतं पण मी काहीच करू शकले नाही. "

ल्युसिलपेक्षा तिची बहीण ५ वर्षांनी लहान होती. तिला काही कामात गुंतवून नैराश्यातून बाहेर काढावं म्हणून ल्युसिलने घेट्टोमध्ये बरीच शोधाशोध केली.
" कुठलीही नोकरी मिळवण्यासाठी ओळखीची, वशिल्याची गरज होती. घेट्टोमध्ये एक सैनिकी टोप्या बनवण्याचा कारखाना होता. तिथे तिला काम मिळावं म्हणून मी प्रयत्न केले. मला तिथल्या लोकांकडून उत्तर मिळण्याऐवजी ' आम्हाला त्याबद्दल  काय मिळणार?' असे प्रश्नच ऐकायला मिळाले. घेट्टोमध्ये कुठलीही गोष्ट फुकट नव्हती. पण मी तिथल्या लोकांना दोष देणार नाही कारण घेट्टोमध्ये राहूनच ते असे झाले होते. घेट्टोमध्ये येण्यापूर्वी ते असेच असतील असं मला वाटत नाही."

पण ल्युसिलने आशा सोडली नाही आणि बरीच सव्यापसव्यं करुन तिने स्वतःसाठी ज्यूंच्या नियामक मंडळाच्या कार्यालयात आणि तिच्या बहिणीसाठी त्या टोप्यांच्या कारखान्यात नोकरी मिळवली. पण दोन्हीही ठिकाणचं वातावरण फार विचित्र होतं, " कुणावरही विश्वास ठेवायची सोय नव्हती. मी माझ्या सहकारी मुलीला काही सांगितलं किंवा बोलले, तर ती त्याचा काय अर्थ काढेल आणि माझ्याविरूद्ध त्या माहितीचा कसा उपयोग करेल त्याचा काही नेम नव्हता. लोक जिवंत राहण्यासाठी एकमेकांच्या पाठीत खंजीर खुपसायलाही तयार होते."

सप्टेंबर १९४२ मध्ये ल्युसिलने घेट्टोचा प्रमुख मोर्डेकाय चाईम रुमकोव्हस्कीचं भाषण ऐकलं. एका नाझी फतव्यानुसार घेट्टोमधल्या सर्व ' बेकार ' लोकांचं - ज्यांच्यात वृद्ध, अपंग आणि लहान मुलांचा समावेश होता - स्थलांतर केलं जाणार होतं. त्याच्या बदल्यात घेट्टोमधल्या काम करू शकणा-या लोकांना जिवंत ठेवलं जाणार होतं. रुमकोव्हस्कीने या भाषणात सर्व मुलांच्या आईवडिलांकडे त्यांच्या मुलांची मागणी केली होती.
" त्या वेळी मी १७ वर्षांची होते. कोणी आईवडिलांकडे त्यांच्या मुलांची मागणी कशी करु शकतो असा प्रश्न मला तेव्हा पडला होता. अजूनही मला त्याचं उत्तर मिळालेलं नाही. "

रुमकोव्हस्की जरी घेट्टोचा प्रमुख असला तरी त्याच्या बोलण्याला मान देऊन ज्यू आपल्या मुलांचं स्थलांतर होऊ देतील यावर नाझींचा विश्वास नव्हता.
" एस्.एस्. चे सैनिक एकदम मोठ्या संख्येने घेट्टोमध्ये आले. त्यांच्याकडे बंदुका होत्याच पण भलेमोठे शिकारी कुत्रेदेखील होते. त्याशिवाय १०-१२ ट्रक्स आणि घोडागाड्याही होत्या. त्यांनी अगदी घराघरांत जाऊन प्रत्येक माणसाला बाहेर काढलं आणि घेट्टोच्या मधल्या मैदानात उभं केलं. आणि मग लोकांना ' निवडायला ' सुरूवात केली. जो कुणी त्यांच्या नजरेत काम करण्यायोग्य नसेल त्याला ते उचलत होते.
मी जिथे राहात होते तिथल्या एका बाईकडे थोडं मेक-अपचं सामान होतं. ते वापरून मी माझ्या बहिणीला तयार केलं - ती तिच्या वयापेक्षा मोठी वाटावी म्हणून. पण त्यांनी नेमकी तिला उचलली. खरंतर ते ११ वर्षांखालच्या मुलांना घेऊन जात होते आणि माझी बहीण १२ वर्षांची होती. मीही तिच्याबरोबर ट्रकमध्ये चढायचा प्रयत्न केला पण एका सैनिकाने त्याच्या रायफलच्या दस्त्याने मला हातांवर जोरात फटका मारला. माझा हात सटकून मी खाली पडले आणि ट्रक वेगाने निघून गेला. पहातापहाता दिसेनासाही झाला."

ल्युसिलने त्यानंतर तिच्या बहिणीला परत कधीच पाहिलं नाही. कदाचित ती चेल्मनो मृत्युछावणीतल्या गॅस चेंबरमध्ये मरण पावली.

आता ल्युसिल पूर्णपणे एकटी पडली. तिचं संपूर्ण कुटुंब तिच्या डोळ्यांसमोर विरून गेलं. ती बोलू शकेल, तिचं सांत्वन करु शकेल असं कुणीही आता नव्हतं आणि अशा वेळी साठीच्या घरातल्या रुमकोव्हस्कीच्या नजरेत ती भरली. घेट्टोमध्ये एक उपाहारगृह आणि अन्नछत्र होतं. त्याने ल्युसिलला तिथे नोकरी देऊ केली. प्रत्येक जेवणासाठी लागणा-या साधनसामग्रीचा हिशोब ठेवणं हे तिचं काम होतं.

रुमकोव्हस्की दररोज काही ना काही कारण काढून तिला भेटायला येत असे, " त्याचा एक पाय किंचित अधू होता आणि तो पाय ओढत चालण्याची त्याला सवय होती. त्याच्या पायाचा तसा आवाज मला ऐकू आला की मी बसल्याजागी थिजून जायचे - पुढच्या प्रसंगाच्या कल्पनेने. मी आॅफिसमध्ये एकटी असेन अशी वेळ साधूनच तो यायचा. आल्यावर एक खुर्ची ओढून त्यावर बसायचा आणि गप्पा मारायचा. असं करताना एक दिवस त्याने माझा विनयभंग केला. माझा हात त्याने आपल्या शिस्नावर ठेवला आणि तो म्हणाला, ' बघ, तुला काही करता येतंय का ते! ' मला त्याचा अर्थच कळला नाही. जेव्हा काहीच झालं नाही तेव्हा रागाने पुटपुटत तो तिथून निघून गेला. नंतर मला योगायोगानं कळलं की तो नपुंसक होता त्यामुळे तो मला काहीही करु शकला नसता. पण त्या वेळी मला आपण गरोदर राहू असं वाटलं. माझ्या एका सहकारी मुलीने मला समजावलं की असं काही घडलेलं नाही. मला राग आला आणि त्याने माझा गैरफायदा घेतला आणि वापर केला असंही वाटलं. तेव्हा मला गैरफायदा म्हणजे काय तेही नीट माहीत नव्हतं. नंतर तर त्याने कहरच केला. त्याने मला सांगितलं की त्याने घेट्टोच्या बाहेर एक जागा माझ्यासाठी बघितलेली आहे आणि फक्त तोच तिकडे मला भेटायला येऊ शकेल. मी तेव्हा रडायला लागले कारण मला घेट्टो सोडून जायची इच्छा नव्हती. "

रुमकोव्हस्कीची ' खास ' मैत्रीण म्हणून राहायला जरी ल्युसिलने नकार दिला असला तरी तिच्या आॅफिसमध्ये येऊन तो तिच्याबरोबर करत असलेले चाळे ती थांबवू शकली नाही, " मी जर तिथून पळून जायचा किंवा निघून जायचा प्रयत्न केला असता तर त्याने माझंही ' स्थलांतर ' करवलं असतं. खरंतर त्याला घेट्टोमध्ये खूप मान होता. लोकांचा त्याच्यावर विश्वासही होता. त्याच्यासारख्या माणसाला असल्या गोष्टी करायची काय गरज होती?"

एक दिवस हे उपाहारगृह आणि अन्नछत्र अचानकपणे बंद झालं आणि तिथे काम करणा-या सगळ्यांना घेट्टोमधल्याच एका चामड्याच्या वस्तू बनवणा-या कारखान्यात पाठवण्यात आलं. ल्युसिलला रुमकोव्हस्की नंतर कधीच भेटला नाही.

१९४४ मध्ये एस्.एस्. ने लोड्झ घेट्टो ' विसर्जित ' केला. तिथल्या उरलेल्या सगळ्या ज्यूंना आॅशविट्झला पाठवण्यात आलं. रुमकोव्हस्की आणि त्याचं संपूर्ण कुटुंब गॅस चेंबरमध्ये मरण पावलं. ल्युसिलला मात्र श्रमछावणीत काम करण्यासाठी निवडण्यात आलं. युद्ध संपेपर्यंत ती तिथेच राहिली.
युद्धानंतर पोलंडमध्ये किंवा जर्मनीत राहायची तिची इच्छा नव्हती. ती अमेरिकेत स्थायिक झाली.

मुलाखतीच्या शेवटी या इतकं सगळं भोगूनही आपला स्वर अजिबात कडवट न होऊ देणा-या स्त्रीने तिच्या युद्धपूर्व आणि घेट्टोमधल्या अनुभवाचं सार सांगितलं, " जर तुम्हाला आलेल्या एखाद्या वाईट अनुभवाने तुम्ही उध्वस्त झालात, तर तुम्हाला सावरायला कोणीही येणार नाही. तुम्हालाच तुमचा आत्मविश्वास परत मिळवावा लागेल आणि उभं राहावं लागेल कारण जगात कुणीही कुणाचं नाही! "

अंधार क्षण - टोइव्ही ब्लाट

नाझींच्या ताब्यातील पोलंडमध्ये राहणं हा एक घुसमटवून टाकणारा अनुभव होता. तुम्ही जर ज्यू असाल तर तुमच्या हालअपेष्टांना सीमाच नव्हती. पोलंड हा ज्यूबहुल असल्यामुळे नाझींना तिथल्या ज्यूंना सर्वात प्रथम संपवणं हे तर्कसंगत वाटत होतं. त्यामुळे त्यांच्यासाठी नाझींनी ट्रेब्लिंका, चेल्मनो, आॅशविट्झ, मायदानेक अशा अनेक मृत्युछावण्या  पोलंडमध्येच बनवल्या होत्या. यामधलंच एक नाव म्हणजे साॅबिबाॅर. जवळजवळ २,५०,००० ज्यूंचे बळी घेणा-या साॅबिबाॅरमधून वाचलेल्या थाॅमस ' टोइव्ही ' ब्लाट या माणसाला भेटणं हा एक संस्मरणीय अनुभव होता.

टोइव्ही ब्लाटच्या या मुलाखतीतून मी बरंच काही शिकलो. त्याचा नाझी राजवटीमध्ये पोलिश ज्यू असण्याचा किंवा साॅबिबाॅरमध्ये राहण्याचा अनुभव तर होताच पण माणसापुढे जेव्हा टोकाची परिस्थिती येते तेव्हा त्याची वागणूक कशी बदलते हे त्याच्या अनुभवांवरून शिकायला मिळालं.

पूर्व पोलंडमधील इझ्बिका नावाच्या एका छोट्या शहरात १९२७ मध्ये टोइव्हीचा जन्म झाला. या शहरात कॅथलिक लोक बहुसंख्याक होते. ज्यूंची संख्या साडेतीन हजारांच्या आसपास होती आणि अनेक वर्षे ज्यू आणि कॅथलिक एकत्र राहिले होते. थोडाफार ज्यू विरोध जरी असला तरी त्याची तीव्रता काही जास्त नव्हती. खुद्द टोइव्हीला त्याच्या वडिलांच्या नावामुळे ज्यू विरोधाची झळ कधीच बसली नाही.

टोइव्हीचे वडील सैन्यात होते. पहिल्या महायुद्धानंतर भडकलेल्या रशियन यादवी युद्धात जेव्हा पोलंडच्या सीमांवर रशियाच्या बोल्शेविक सैन्याने आक्रमण केलं तेव्हा त्याचे वडील त्या युद्धात लढले होते आणि त्यात अपंगत्व आल्यामुळे त्यांना जरी घरी परत यावं लागलं असलं तरी सगळीकडे स्वातंत्र्यसैनिक म्हणून त्यांना लोक ओळखत होते. कॅथलिक लोकांनाही त्यांच्याविषयी आदर होता. त्यामुळे टोइव्हीला ज्यू विरोध जरी ऐकून माहीत असला तरी त्याच्यावर तसा प्रसंग आला नव्हता.

नाझींच्या आगमनानंतर परिस्थिती आमूलाग्र बदलली. टोइव्हीला जाणवलेली गोष्ट म्हणजे अचानक कॅथलिकांच्या वागण्यात बदल झाला, " त्यांना एकदम अशी जाणीव झाली की आम्ही दुय्यम दर्जाचे लोक आहोत. त्यामुळे आता आम्हाला काहीही केलं तरी आम्ही त्याचा प्रतिकार करण्याच्या स्थितीत नाही आहोत. त्यामुळे ज्यूंची दुकानं फोडणं, त्यांच्या घरांमध्ये पेटते बोळे फेकणं, ज्यूंना भर रस्त्यात मारणं असे प्रकार राजरोसपणे सुरु झाले. मला नाझींपेक्षाही माझ्या कॅथलिक शेजा-यांची जास्त भीती वाटायची कारण नाझी मला ओळखत नव्हते पण माझे शेजारी मला नक्कीच ओळखत होते. "

इझ्बिका शहर तिथल्या चामड्याच्या वस्तू आणि कातडी कमवायचा कारखाना यामुळे प्रसिद्ध होतं. बरेचसे ज्यू हे या कारखान्यात काम करणारे कुशल कामगार होते. जरी नाझींनी अधूनमधून इझ्बिकामधल्या ज्यूंचं ' स्थलांतर ' केलेलं असलं तरी बरेचसे ज्यू तिथे अजूनही होते आणि नाझींना चामड्याची गरज असल्यामुळे हा कारखाना बंद होणार नाही आणि आपलं स्थलांतर होणार नाही अशी एक आशा त्यांच्या मनात होती.

पण एप्रिल १९४३ मध्ये नाझींनी संपूर्ण इझ्बिका शहर स्थलांतरित करायचा निर्णय घेतला. " पहाटे ४ वाजता गोळीबाराच्या आवाजाने मला जाग आली. मी खिडकीतून पाहिलं तेव्हा नजर जाईल तिकडे फक्त नाझी सैनिक दिसत होते. माझ्या घरातून त्यांनी मला उचललं आणि बाहेर सैनिकांच्या पहा-यात उभ्या असलेल्या लोकांमध्ये उभं केलं. हा आपला शेवट असू शकतो अशी मला अचानक जाणीव झाली. काय करु शकत होतो मी? "

अचानक टोइव्हीपुढे सुटकेची संधी आली. तिथल्या पहारेक-यांपैकी एकाला सिगरेटची तल्लफ आली होती. त्याने सिगरेट पेटवायला म्हणून आपला चेहरा दुस-या बाजूला वळवला. " मी ती संधी साधली आणि त्या लोकांमधून बाहेर आलो. "

ज्यूंची गठडी वळलेली पहायला अनेक लोक तिथे आले होते. टोइव्ही त्यांच्यात जाऊन उभा राहिला, " पण माझ्या लक्षात आलं की मी फार वेळ स्वतःला वाचवू शकणार नाही कारण बहुतेक जणांना मी कोण आहे हे माहीत होतं. अगदी माझा घनिष्ठ मित्र जरी तिथे असला तरी त्याने मला ओळख दाखवू नये अशीच माझी इच्छा होती. मला तेवढ्यात माझा मित्र यानेक दिसला. तो आणि मी एकमेकांना लहानपणापासून ओळखत होतो. आमचं एकमेकांच्या घरीदेखील येणंजाणं होतं. मी लगेचच त्याच्याकडे गेलो आणि विनंती केली की नाझी निघून जाईपर्यंत तरी मला कुठेतरी लपून राहायला मदत कर. यानेकने होकार दिला आणि असं सुचवलं की सूर्योदय होऊन सगळं स्पष्टपणे दिसायला लागण्याआधी मी गावातून पळून जावं कारण एकदा दिवस उजाडल्यावर मला गायब होता येणार नाही. त्याने मला गावाबाहेर असलेल्या  शेतातल्या एका रिकाम्या कणगीत लपायला सांगितलं. त्याचं स्वतःचं घर तिथून जवळच होतं. तो म्हणाला की एक तासाभरात तो तिथे पोचेल."

टोइव्हीने सांगितल्याप्रमाणे केलं. पण तो जेव्हा त्या कणगीपाशी गेला तेव्हा त्याला तिच्या दरवाज्यावर भलंमोठं कुलूप दिसलं. तो यानेकची वाट पाहात बाहेरच थांबला. तेव्हा गावातल्याच एका ओळखीच्या कॅथलिक स्त्रीने त्याला पाहिलं आणि ती ओरडली, " टोइव्ही पळ! इथून पळून जा! "
" काय झालं? " टोइव्हीने विचारलं.
" तो बघ यानेक येतोय! "
टोइव्हीला कळेना. यानेक येतोय तर त्यात पळण्यासारखं काय आहे? पण त्याने जेव्हा वळून पाहिलं तेव्हा त्याला यानेक एका नाझी सैनिकाबरोबर येताना दिसला.
" यानेक! " टोइव्ही ओरडला, " हे काय करतो आहेस तू? "
" हाच तो मी तुम्हाला सांगितलेला ज्यू! " यानेक त्या नाझी सैनिकाला म्हणाला.

जेव्हा तो नाझी सैनिक टोइव्हीला घेऊन जायला लागला तेव्हा यानेक जे बोलला त्याने टोइव्हीच्या अंगावर सर्रकन काटा आला. पुढे आयुष्यभर हे उद्गार टोइव्हीची झोप उडवणार होते - " मी लवकरच तुझ्यापासून बनवलेला साबण दुकानात बघेन टोइव्ही! "
(ज्यूंना मारल्यावर त्यांच्या शरीरातील चरबी बाहेर काढून एस्.एस्. ती जर्मन कंपन्यांना साबण बनवण्यासाठीचा कच्चा माल म्हणून विकत असे. त्यावेळी अशी अफवा होती. नंतर ते खरं होतं हे सिद्ध झालं. जर्मन कंपन्यांना ही चरबी विकून मिळालेले पैसे एस्.एस्. ने युद्धप्रयत्नांसाठी वापरले. त्यासाठी एस्.एस्. चा खास आर्थिक विभाग होता.)

मी जेव्हा टोइव्ही ब्लाटची मुलाखत घेतली तेव्हा म्हणजे ५० वर्षांनंतरही तो ही घटना सांगताना अत्यंत अस्वस्थ झाला, " पण मला आश्चर्य नाही वाटलं. मी अशा विश्वासघातासाठी मनाची तयारी केली होती."

तो नाझी सैनिक टोइव्हीला शहराच्या मध्यभागी असलेल्या बाजारपेठेत घेऊन गेला. तेव्हा त्याला त्याची आई, वडील आणि भाऊ असे तिघेही तिथे नाझींचे कैदी म्हणून दिसले. " त्याक्षणी काहीच वाटलं नाही. मी अतिशय घाबरलो होतो. इतके दिवस नाझी मृत्युछावण्यांबद्दल ऐकलं होतं. आता तिथे नेऊन मला मारतील का आत्ताच मारतील ते काही कळत नव्हतं. मला अर्थातच मरायचं नव्हतं. मी जेमतेम १५-१६ वर्षांचा होतो."

या सगळ्यांना नंतर एका मालगाडीतून कोंबून पुढे पूर्वेकडे पाठवण्यात आलं. " आशा ही मोठी विचित्र भावना आहे," टोइव्ही म्हणाला, " आम्ही या गाड्यांविषयी ऐकलं होतं. या गाड्यांमधून लोक कुठे जातात तेही आम्हाला माहीत होतं. तरीही लोक प्रवासात हेच बोलत होते की आपल्याला नाझी मारणार नाहीत. नाझींना चामड्याची गरज आहे. आपण जिवंतपणी त्यांच्या जास्त कामी येऊ शकतो. आपण कदाचित एखाद्या श्रमछावणीत जाऊ!"

पण ब-याच तासांनी ही गाडी साॅबिबाॅर नावाच्या मृत्युछावणीत पोचली. ट्रेब्लिंकाप्रमाणेच साॅबिबाॅरलाही रेल्वे स्थानक हे मृत्युछावणीतच होतं.
टोइव्हीने नरकसमान जागेची कल्पना केली होती पण हे ठिकाण एखाद्या खेड्यासारखं टुमदार होतं. सगळ्या इमारतींना, अगदी कुंपणालाही ताजा रंग होता. सगळीकडे फुलांचे ताटवे होते. त्यावर फुलपाखरं उडत होती. रेल्वे स्थानकावर येणा-या आणि जाणा-या गाड्यांची यादी लावलेली होती.

हा सगळा बनाव आहे हा विचार टोइव्हीच्या मनात आला. इतरांनाही हळूहळू समजलं की आपल्या आयुष्याचा अंत इथे होणार आहे. साॅबिबाॅरला उतरल्यावर तिथल्या एस्.एस्. पहारेक-यांनी त्यांची दोन गटांमध्ये विभागणी केली - स्त्रिया आणि मुलं हा एक गट आणि पुरूषांचा दुसरा गट.

आज जेव्हा मृत्युछावण्यांबद्दल लोक ऐकतात तेव्हा त्यांना एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की या कैद्यांना जेव्हा समजलं की ते मरणार आहेत, तेव्हा त्यांनी कुठल्याही प्रकारे प्रतिकार का केला नाही? इतके सगळे ज्यू कसे एवढ्या शांतपणे आपल्या मृत्यूला सामोरे गेले? त्यांनी काहीच विरोध कसा केला नाही?
जेव्हा मी युद्धोत्तर काळात जन्मलेल्या ज्यूंना, विशेषतः इझराईलमधल्या ज्यूंना भेटतो आणि हा विषय निघतो तेव्हा मला असं लक्षात येतं की हा एक वादाचा मुद्दा आहे. इझराईलमधल्या आजच्या काही  ज्यूंसाठी तर ही शरमेची गोष्ट आहे. मला एका इझरेली ज्यू माणसाने ऐकवलं होतं - " तुम्हाला वाटत असेल सगळे ज्यू गरीब बिचारे असतील तर ते चुकीचं आहे. पोलंडचे भित्रे ज्यू असतील तसे पण मी तसा नाही. मी ओल्ड टेस्टामेंटमधला, अरेला कारे करणारा ज्यू आहे. मी इतक्या सहजपणे नाझींना मला मारु दिलं नसतं! "

मला स्वतःला हा ' भित्रेपणाचा ' आरोप पटत नाही. ज्या लाखो ज्यूंनी आपले प्राण दिले त्यांच्या हौतात्म्याचा हा अपमान आहे हे माझं मत आहे. एकतर विरोध करणं अशक्य होतं. लोकांचं मानसिक खच्चीकरण करण्यामध्ये नाझींचा हात कोणीही धरला नसता. स्टॅलिनच्या रेड आर्मीच्या सैनिकांचाही आॅशविट्झ बघून थरकाप उडाला होता. एस्. एस्. चे पहारेकरी आणि सैनिक हे अत्यंत कडवे आणि कट्टर ज्यूविरोधी होते. कुणी जराही विरोध केला तर ते सरळ गोळ्या घालत. जवळजवळ सगळ्या मृत्युछावण्या या रेल्वेने जोडलेल्या होत्या आणि रेल्वे स्थानकं मृत्युछावणीतच असायची. त्यामुळे जेव्हा हे ज्यू कैदी गाडीमधून उतरायचे तेव्हा ते छावणीच्या मध्यावर असत आणि आजूबाजूला टेहळणी मनोरे असायचे. तिथले सैनिक २४ तास या कैद्यांवर नजर ठेवून असत.

आणि या सगळ्या अडथळ्यांना चकवून जर कोणी एखादा तिथून पळालाच तर पुढचा सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे पळून जाणार कुठे? छावणीच्या आजूबाजूला जी छोटी गावं होती, तिथले लोक या पळालेल्या लोकांना पकडून परत नाझींच्या हवाली करत असत. त्यासाठी त्यांना नाझींकडून बक्षीसही मिळत असे.

अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कितीतरी ज्यू कैदी हे वृद्ध आणि आजारी होते. त्यांची तब्येत इतकी खालावलेली असे की सुटका करुन घेण्याची इच्छाच त्यांना होत नसे, आणि जरी झाली तरी शरीर साथ देत नसे. अजून एक प्रश्न होता तो म्हणजे स्त्रिया आणि मुलांचा. लिथुआनियामध्ये मला एक नाझींच्या कैदेतून यशस्वीपणे पळालेली स्त्री भेटली होती. तिने सांगितलेला एक प्रसंग मला अजून आठवतो. १९४१ मध्ये नाझींनी लिथुआनिया ताब्यात घेऊन तिथल्या ज्यूंना मारणं चालू केलं. ही स्त्री तेव्हा किशोरवयीन असेल. तिच्या गावातल्या सगळ्या ज्यूंना नाझी सैनिक गावाबाहेरच्या जंगलात घेऊन चालले होते. पण पहारेक-यांची संख्या कमी होती. या स्त्रीची गावाबाहेरच्या शेताडीतून पलायन करायची योजना होती. तिच्या शेजारून चालणा-या दुस-या एका स्त्रीला जेव्हा तिने आपल्याबरोबर यायला सांगितलं तेव्हा त्या स्त्रीने आपल्या दोन लहान मुलांकडे पाहिलं, " यांना असंच टाकून मी कशी येऊ? " तिने विचारलं.

लहान मुलं हा नाझीप्रणित ज्यू वंशसंहारातला एक निर्णायक मुद्दा होता. कुठल्याही स्त्रीने स्वतःसाठी आपल्या मुलांचा भरारी पथकांच्या बंदुकांसमोर किंवा गॅस चेंबरमध्ये बळी दिलेला नाही. आणि हे निरीक्षण कुणा इतिहासकाराचं नाही तर आॅशविट्झचा कमांडंट असलेल्या रुडाॅल्फ होएसचं आहे. आॅशविट्झ आणि इतर मृत्युछावण्यांमध्ये धडधाकट लोकांना वेगळं काढत असत. बाकीच्यांची - अपंग, आजारी, वृद्ध आणि लहान मुलं - सरळ गॅस चेंबरमध्ये रवानगी होत असे. तेव्हा स्त्रिया आपणहून आपल्या मुलांसोबत गॅस चेंबरमध्ये जात. एकाही स्त्रीने आपल्या मुलांना एकटं गॅस चेंबरमध्ये पाठवलं नाही.

साॅबिबाॅरमध्येही अशी विभागणी झाली. गॅस चेंबरमध्ये जाणा-या लोकांना बाजूला काढल्यावर तिथल्या अधिका-याने कोणी सुतारकाम करणारं आहे का असा प्रश्न विचारला. टोइव्हीने सुतार नसूनही हात वर केला, " मी मनातल्या मनात प्रार्थना करत होतो की या अधिका-याला मला निवडण्याची बुद्धी दे. आणि तसंच घडलं. "

टोइव्हीला अर्थातच फक्त सुतारकाम नाही तर सोन्डरकमांडोची इतर कामंही करावी लागली. त्यामुळे त्याची जरी मृत्यूपासून तात्पुरती सुटका झाली असली, तरी त्याला आपल्या आईवडिलांना आणि धाकट्या भावाला गॅस चेंबरमध्ये जाताना पाहावं लागलं. " मला काहीच वाटलं नाही. त्यावेळी मला त्याचं आश्चर्य वाटलं. जर माझ्या आईवडिलांपैकी कोणा एकाचा मृत्यू दोन दिवसांपूर्वी झाला असता तर मला आत्यंतिक दुःख झालं असतं. मी अक्षरशः दिवस आणि रात्रभर रडत बसलो असतो. आणि आता माझं संपूर्ण कुटुंब एका क्षणात नष्ट झालं आणि मी एक अश्रूदेखील ढाळला नाही. युद्ध संपल्यावर मी माझ्यासारख्या इतर लोकांना भेटलो आणि त्यांना विचारलं की त्यांची प्रतिक्रिया काय होती? प्रत्येकाने मला हेच उत्तर दिलं की त्यांना रडू आलं नाही. मी याला निसर्गाने केलेलं संरक्षण म्हणतो. जर मी रडलो असतो तर गॅस चेंबरमध्ये जाणा-या पुढच्या कैद्यांमध्ये जावं लागलं असतं. "

टोइव्हीमध्ये ही स्वसंरक्षणाची प्रेरणा इतकी प्रबळ होती की त्याने सोन्डरकमांडोची मानसिक दृष्ट्या अत्यंत कठीण आणि मनाला पिळवटून टाकणारी कामंही एक प्रकारच्या विचित्र अलिप्तपणे केली. त्याचं मुख्य काम होतं गॅस चेंबरमध्ये जाणा-या स्त्रिया आणि मुलींचे केस भादरणं आणि त्यांना गॅस चेंबरच्या दरवाज्यापर्यंत सोडणं. हजारो स्त्रिया आणि मुलींना त्याने त्या दरवाज्यातून आत जाताना आणि हिरवीनिळी पडलेली प्रेतं म्हणून बाहेर येताना पाहिलं. पण त्याच्या डोळ्यांमधून अश्रू आले नाहीत.

त्याने सांगितलेला एक प्रसंग माझ्या मनात अजूनही घर करुन बसलेला आहे. एकदा छावणीच्या बाहेर गावात राहणा-या शेतक-यांनी दोन ज्यू तरुणींना पकडून आणलं होतं. दोघीही जंगलात लपलेल्या होत्या आणि शेतक-यांच्या हातात सापडल्या होत्या. छावणीतल्या एका जर्मन अधिका-याने टोइव्हीला त्या दोघींना गॅस चेंबरमध्ये न्यायला सांगितलं आणि टोइव्ही त्या दोघींना तिथे नेत असताना तो अधिकारी त्यांच्यामागोमाग येत होता.
या दोन मुलींपैकी एकीने टोइव्हीची विनवणी करायला सुरुवात केली. पण त्याच्या हातात काहीच नव्हतं. त्याने त्या दोघींनाही गॅस चेंबरच्या दरवाज्यापर्यंत सोडलं आणि तो माघारी वळला. दोन मिनिटांच्या आत दोन गोळीबाराचे आवाज ऐकू आले. फक्त दोन मुलींसाठी नाझी थोडंच गॅस चेंबर चालू करणार होते?

टोइव्हीची खात्री होती की ज्या जर्मन अधिका-याने त्याला त्या मुलींना गॅस चेंबरच्या दरवाज्यापर्यंत न्यायला सांगितलं होतं त्याची स्वतःची त्यांना तिथे नेण्याची हिंमत नव्हती. असा मानसिक त्रास सहन करणं हा सोन्डरकमांडोच्या कामाचा भाग होता.

सप्टेंबर १९४३ मध्ये साॅबिबाॅर सोन्डरकमांडोच्या नशिबाने कलाटणी घेतली. तेव्हा रेड आर्मीमधले काही सैनिक साॅबिबाॅरमध्ये युध्दकैदी म्हणून आले होते. एकतर हे सगळे सैनिक असल्यामुळे त्यांच्यात एक शिस्त आणि कणखरपणा होता. अलेक्झांडर पेचेर्स्की हा या सैनिकांमधला नेता होता. त्याच्या नेतृत्वाखाली या सैनिकांनी उठावाची तयारी केली, सोन्डरकमांडोच्या सदस्यांनाही त्यात सहभागी करुन घेतलं आणि १४ आॅक्टोबर १९४३ या दिवशी उठावाला सुरूवात केली. त्यांनी प्रथम काही पहारेक-यांचं लक्ष वेधून घेऊन त्यांना तिथल्या कारखान्यात बोलावलं आणि तिथे त्यांना ठार मारून, त्यांचे गणवेष आणि शस्त्रं घेऊन पलायन केलं. जे सोन्डरकमांडो सर्वात पहिल्यांदा काटेरी तारांच्या कुंपणाकडे पोचले त्यांनी त्या तारा तोडल्या आणि मागून येणा-यांसाठी जागा केली. त्यांच्यात टोइव्हीचाही समावेश होता. " छावणीच्या जवळ जंगल होतं. बाहेर पडल्यावर मी त्या जंगलाच्या दिशेनेच धावत सुटलो. धावता धावता दोन-तीन वेळा पडलो. मागून जर्मनांचा गोळीबार होत होता. मला वाटलं मला गोळी लागली की काय. पण तसं काही नाही हे लक्षात आल्यावर मी उठून परत पळायला सुरूवात केली. शेवटी त्या जंगलात पोचलो. "

जवळजवळ ३००-६०० सोन्डरकमांडो या सुटकेच्या प्रयत्नात सहभागी होते. पण त्यातले फार थोडे वाचले. अनेक ज्यू नसलेल्या पोलिश लोकांनी या कैद्यांना एस्.एस्.च्या हवाली केलं. जे बचावले त्यांच्यात टोइव्ही एक होता आणि जितक्या ज्यू नसलेल्या लोकांनी त्याचा विश्वासघात केला तितक्याच लोकांनी त्याला मदतही केली.

" जेव्हा तुमच्यासारखे लोक मला विचारतात की या सगळ्या अनुभवांमधून तुम्ही काय शिकलात तेव्हा माझं एकच उत्तर असतं - इतरांचं सोडा, तुम्ही स्वतःलाही ओळखू शकत नाही. एखाद्या माणसाला तुम्ही पत्ता विचारलात, तर तो कदाचित वाट वाकडी करुन तुम्हाला तो पत्ता दाखवायला येईल. पण वेगळ्या परिस्थितीत तोच माणूस तुम्हाला विकून खाईल. आपण परिस्थितीनुसार चांगले किंवा वाईट असतो. आजही जेव्हा एखादा माणूस माझ्याशी चांगला वागतो तेव्हा माझ्या मनात विचार येतो - हा साॅबिबाॅरमध्ये माझ्याशी कसा वागला असता? "